पेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.
सूर्य ऊर्जा एकत्रित करण्यात पेटी पद्धतीची चूल तांत्रिक दृष्ट्या कमी कार्यक्षम आहे.
उचलायला व सरकवायला (विशेषतः गृहिणींसाठी) अवजड आहे.
अन्न शिजायला ३ ते चार तास लागतात.
अंतर्गोल अारशाची चूल वरील तीनही मर्यादांवर मात करू शकते. मात्र ती बिनचूक पद्धतीने बनवणे आवश्यक आहे. मी जी.एन्.यू. ऑक्टेव्ह या मुक्त संगणक प्रणालीचा वापर करून कोणत्याही आकाराचा सूर्यचूल आरसा तयार करण्याचा प्रोग्राम लिहिला आहे. जिज्ञासू व्यक्तींनी तो वापरून कोणत्याही आकाराची अशी चूल बनवावी.
सरळ एकप्रतलीय पृष्ठभाग वापरून paraboloid करता येत नाही कारण तो त्रिमित आकार आहे. पण अनेक पाकळ्या वापरून त्या जोडल्या तर paraboloid च्या जवळ जाणारा त्रिमित आकार बनवता येतो. हा प्रोग्राम लिहिताना
पाकळीवरील प्रत्येक बिंदू हा उभ्या parabola चा घटक आहे. आणि ,
तोच बिंदू हा आडव्या रिंगचा (वर्तुळाचा) घटक आहे.
ही वस्तुस्थिती विचारात घेतली आहे.
तुम्ही हे करून पाहू शकता
ज्या व्यक्तींना हा प्रोग्राम वापरणे शक्य नाही त्यांच्या साठी, चार माणसांची भाजी-भात आमटी सुमारे १ तासात तयार करण्यासाठी जो आरसा लागेल. तो कसा तयार करायचा याची थोडक्यात कृती येथे देत आहे.
कोणताही चकचकीत पृष्ठभाग (कागद, पुठ्ठा, स्टेनलेस स्टील पत्रा इत्यादि) विशिष्ट पद्धतीने कापून एक पाकळी बनवा. पाकळीची मोजमापे व आकार पुढे दिला आहे. मोठ्या आकारात पहाण्यासाठी आकृतीवर क्लिक करा. हा साधा त्रिकोण नाही हे ध्यानात घ्या.
अशा ३६ पाकळ्या बनवा.
प्रत्येक पाकळीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे विशिष्ट उंचीपाशी विशिष्ट रुंदी असायला हवी. उदा. 18.36 से.मि. उंची असताना पाकळीची रुंदी 3.1 सें.मि.असायला हवी. किंवा 34.04 उंची असताना 5.43 सें.मि. रुंदी असायला हवी.
या सर्व पाकळ्या एकमेकांना अशा जोडा की शू्न्य रुंदी असलेली टोके एकत्र येतील आणि सर्वात रुंदअसलेला भाग सर्वात वर असेल.
अशा रीतीने तयार झालेला आरसा शेजारील छायाचित्रात दाखवला आहे. तुम्ही त्याचा स्टँड तयार केला नाही तरी चालेल. कारण एका तासात सूर्य स्वतःचे स्थान फार बदलत नाही. या वेळेत अन्न पदार्थ शिजवून तयार होतात.
आरशाची वैशिष्ट्ये
या पाकळ्यांची मापे अशी आहेत की ज्या जोडल्याने सपाट पृष्ठभागाचा वापर करून परवलयाकृती (paraboloid) त्रिमित आकार तयार होईल. या आकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यावर समोरून पडणारे सूर्य किरण एकत्र होऊन त्याच्या केंद्रस्थानी येतात. या केंद्रावर आपण आपले शिजवण्याचे पदार्थ ठेवायचे आहेत. एकत्रित किरणांमधे असलेली ऊर्जा आपले पदार्थ लौकर शिजवते.
मोठ्या आकाराचे आरसे वापरले तर मोठ्या प्रमाणात अन्न शिजवता येईल.
हे आरसे शेतावर, शाळांत खिचडी शिजवण्यासाठी , विविध शिबिरांमधे वापरता येतील. इंधनाची बचत होण्यासाठी ते फार उपयुक्त ठरेल.
कोणता पृष्ठभाग वापरून पाकळ्या बनवल्या आहेत त्यावर आरशाचा दणकटपणा, वजन व किंमत अवलंबून आहे.
प्रत्येक पाकळी बनवण्यासाठी पुढील मोजमापे बिनचूक वापरणे उपयुक्त व गरजेचे ठरेल.
मागच्या लेखात आपण असं पाहिलं की मुक्त संगणक प्रणालीची खरी शक्ती, लेखकांनी मुक्त केलेल्या उगम कार्यक्रमात आहे.
हा उगम कार्यक्रम आम्हाला समजत नाही त्यामुळे मुक्त प्रणालींचं आम्हाला महत्व का वाटावं, असं अनेकांचं म्हणणं असतं. हा उगम कार्यक्रम कोण समजून घेऊ शकतो ? याचं उत्तर असं आहे – लिहिता वाचता येणारं कोणीही !
मात्र त्यासाठी तो समजून घेण्याची इच्छा, वेळ आणि कष्टाची तयारी या गरजेच्या गोष्टी आहेत. समजा या तीनही गोष्टी तुमच्या कडे नसतील आणि यातलं आपल्याला काय समजणार, अशी भीती मनात असेल तर तुमचा असा मित्र/मैत्रिण गाठा की जी हे करू शकते. ती कदाचित इंजिनियर असेल, कॉंप्यूटर क्षेत्रातली जाणकार व्यक्ती असेल. विज्ञान क्षेत्रातील तज्ञ असेल. माझ्या माहितीत काही डॉक्टरही (रोग्यांना औषध देणारे) असे आहेत की जे यात रस घेऊन काम करतात.
उगम कार्यक्रम खुला करण्याच्या या अटी मुळे केवळ संगणकीय प्रणालीच मुक्त झाल्या आहेत असं नाही, तर त्या वापरल्यामुळे आपणही (खाजगीपणा जाण्याच्या) भीतीतून मुक्त होतो.
सा विद्या या विमुक्तये
मुक्त उगम कार्यक्रम अनेकांना मुक्त करतात. ही मुक्तता मिळालेल्यात प्रथम येतात संगणकशास्त्राचे विद्यार्थी. गल्लोगल्ली असलेल्या संगणकशास्त्राच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा दर्जा यथातथाच आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचं महत्वाचंं कारण म्हणजे चांगली प्रणाली कशी लिहायची असते हे त्या विद्यार्थ्यांना कधी पहायलाच मिळालेलं नाही. केवळ मुक्त प्रणालीच ही अडचण सोडवू शकते. खुले उगम कार्यक्रम पाहून, वाचून, समजून घेऊन हे विद्यार्थी जाणकार होऊ शकतात. आणि जाणकाराकडेच असते निर्मितीची शक्ती.
मुक्त प्रणाली, मूळ उगम कार्यक्रमात आपल्या गरजे नुसार बदल करण्याचं स्वातंत्र्यही देते. त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या गरजे प्रमाणे नव्याने प्रणाली विकसित करू शकतात.
अनेक पदव्या घेतल्यावरही काहीच निर्माण न करता येणारे आपल्या भारत देशात प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळेच ते बेकारीच्या भीतीच्या छायेत सतत वावरत असतात. या भीतीतून विद्याच त्यांना मुक्त करू शकते केवळ पदवी नव्हे. विद्या प्राप्त करून घेण्याची संधी मुक्त प्रणाली देत असते. “सा विद्या या विमुक्तये” या संस्कृत अवतरणाचा अर्थ तोच आहे.
उगम कार्यक्रम खुला केल्यामुळे आणखी एक फायदा होत असतो. या कार्यक्रमात थोडा फरक केल्यामुळे नव्या सोयी असणारी प्रणाली पटकन निर्माण करता येते. त्यामुळे नव्या प्रणाली मुळापासून लिहाव्या लागत नाहीत आणि वेळ वाचतो. मुक्त प्रणाली वापरल्यानं चाकाचा शोध आपल्याला पुन्हा पुन्हा लावावा लागत नाही. (“We don’t have to re-invent the wheel”).
शब्दे वाटू धन जन लोकां
मुक्त संगणक प्रणालीचं वैशिष्ट्य केवळ उगम कार्यक्रम खुला करणं इतकंच नाही. तर मूळ प्रणालीच्या बदललेल्या अनेक आवृत्ती लोकांना वितरितही करता येतात यात आहे.
संगणकशास्त्राच्या वर्गात कोणी एकानं लिहिलेल्या प्रणालीचा उगम कार्यक्रम, त्यानं सर्वांना वाटलाच पाहिजे असा नियम असायला हवा. त्यामुळे मुक्त प्रणालीचे फायदे विद्यार्थीदशेपासूनच सगळ्यांना कळतील. हे कॉपी करणं नाही का होणार ? हो होईल ! पण ते वाईट असेल असं नाही. ते सहकार्याची भावना वाढवेल आणि कमी वेळात नव्या सोयी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी प्रत्येक विद्यार्थ्याला देईल. शिवाय मूळ प्रणाली मधे छोटे छोटे बदल केलेल्या अऩेक प्रणाली निर्माण होतील.
आई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं.
आपण पिढ्यान् पिढ्या वेगवेगळे पदार्थ खात आलो. अगदी कोणती वनस्पती, भाजी म्हणून खाण्यायोग्य आहे- विषारी तर नाहीना, हे ठरवण्यासाठीही काही शतकांपूर्वी कोणीतरी धोका पत्करला होता. काहींनी एखादा पदार्थ अधिक चवदार बनवला, काहींनी मसाल्यांचा शोध लावला. आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया, माहिती त्यांनी आपल्या शेजाऱ्यांपासून दडवली नाही. ती मुक्त केली. म्हणून आपण आज पोषक, चवदार जेवण जेवू शकतो. मानव जातीचा भविष्यकाळ सुखदायी व्हावा म्हणून मुक्त प्रणाली ही भूमिका आज बजावत आहेत.
विज्ञान केंद्र मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कार करते. (मुक्त संगणक प्रणालींबद्दल अधिक माहितीसाठी ही विज्ञान केंद्र निर्मित पुस्तिका वाचा.) जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत. आम्ही मुक्त संगणकीय प्रणालींचाच पुरस्कार का करतो असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचं सर्वात महत्वाचं उत्तर म्हणजे या प्रणाली संगणकाच्या वापरकर्त्याला मुक्त ठेवतात. जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी विंडोझ प्रणाली ही वापरणाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य देत नाही. इतकंच नव्हे तर त्यांचं स्वातंत्र्य काढून घेेते.
स्वातंत्र्य-कुठे स्वातंत्र्य-कुणा स्वातंत्र्य ?
कविवर्य वसंत बापटांच्या कवितेतली ही ओळ छान आहे. पण….
संगणकाची एखादी प्रणाली वापरण्याचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय ?
कुणाचं स्वातंत्र्य कोणी काढून घेतलं होतं, कोणी मिळवून दिलं ?
हे स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे का ?
काही दिवसांपूर्वी अशाच विषयावर एका सभेत बोलल्यावर एक तरूण मुलगा मला नंतर येऊन भेटला. मला म्हणाला, तुमच्या भाषणातले अनेक मुद्दे कळले पण तुम्ही वर्णन केलेल्या संगणकीय पारतंत्र्याची दाहकता नाही कळली !
आपण भारतीय लोक एकमेकांवर फार अवलंबून असतो. आपल्या कुटुंबावर, शेजाऱ्यावर, गल्लीतल्या लोकांवर, जातीवर, समाजावर आणि देशावर. त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याची महती समजलेलीच नाही. ती एकदा समजली की मग ही दाहकता कळून येईल.
हा लेख आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात स्थान मिळवून बसलेल्या संगणकासंबंधातल्या स्वातंत्र्या बद्दल आहे. त्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल आहे.
संगणकीय स्वातंत्र्याची चार कलमे
कोणत्याही कारणासाठी कितीही संगणकांवर ती प्रणाली वापरण्याचे स्वातंत्र्य. (तुम्ही जेव्हा विंडोझ वा तत्सम अमुक्त प्रणाली वापरता त्यावेळी प्रत्येक संगणकासाठी ती वापरण्याचे वेगळे लायसेन्स फी भरून तुम्हाला घ्यावे लागते.)
या प्रणालीचा उगम (सोर्स कोड) पाहून अभ्यासण्याचे स्वातंत्र्य. उगमात बदल करून प्रणाली इतर कोणत्याही वेगळ्या कारणासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य. या सगळ्यासाठी मुक्त प्रणाली लिहिणाऱ्यांनी त्याचा उगम सर्वांसाठी खुला केलेला असलाच पाहिजे.
या प्रणालीच्या नकला करून त्या इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. या मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना – शेजाऱ्यांना मदत करू शकता.
मूळ प्रणालीत तुम्ही बदल केल्यानंतर या नव्या रूपातल्या प्रणालीच्या नकला इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. त्यामुळे तुम्ही केलेला बदलही इतरांपर्यंत जाऊन पोहोचतो. यासाठी तुम्ही बदल केलेला उगम या नकला बरोबर उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरते.
बंधनात टाकणाऱ्या प्रणाली
तुम्हा आम्हाला बंधनात टाकणाऱ्या प्रणाली वर लिहिलेल्या एकाही स्वातंत्र्याचा लाभ देत नाहीत. याचा अर्थ काय ते आधी पाहूया.
कोणतीही संगणकीय प्रणाली लिहिण्यासाठी आधी
तिचा सोर्स कोड (उगम कार्य-क्रम) तयार करावा लागतो.
तो लिहिल्यावर कंपाइल केला जातो.
तेव्हा त्याचे रूपांतर असे होते की संगणक त्याचा वापर करू शकतो. याला एक्झिक्यूटेबल (संगणकीय वापरायोग्य) फाइल असे म्हणतात.
आपण जेव्हा ही फाइल संगणकावर चालवतो तेव्हा आपल्याला अपेक्षित काम संगणकाकडून केले जाते.
तुमच्या असं लक्षात येईल की उगम कार्यक्रम हा या पायऱ्यांमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. उगम कार्यक्रम माणसेच तयार करतात. नंतर त्याचे रूपांतर संगणकामार्फतच वापरायोग्य फाइलमधे केले जाते. एकदा का वापरायोग्य फाइलमधे हे रूपांतर झाले की ती फाइल माणसांना थेट वाचून समजत नाही. पण उगम कार्यक्रम मात्र वाचून समजून घेता येतो. अमुक्त प्रणालींचे निर्माते केवळ अशा फाइल्सच तुमच्या पर्यंत पोचवतात.
कोणतीही अमुक्त प्रणाली कधीही उगम कार्यक्रम वापरकर्त्याला उपलब्ध करून देत नाही. तुम्ही असे विचाराल की मला कुठे उगम कार्यक्रम वाचून समजतो ? आणि समजला तरी त्याचे मी काय करू ?
तुम्हाला स्वतःला जरी हा उगम समजला नाही तरी तुमच्या कोणा मित्र मैत्रिणीला हा समजू शकेल आणि अपेक्षित कार्याशिवाय एखादे गुप्त कार्य ही प्रणाली तुम्हाला अज्ञानात ठेऊन करते आहे का याचा शोध लागेल. पण असे गुप्त (आणि दुष्ट) काम केले जाते का ?
होय असे केले जाते ! तुम्हाला माहिती असलेला संगणकीय व्हायरस हे त्याचे एक उदाहरण आहे. असा व्हायरस तुमच्या एखाद्या नेहमीच्या वापरतल्या (उदा. वर्ड प्रोसेसर) प्रणालीला चिकटतो आणि स्वतःचा दुष्ट कार्यभाग साधतो. पण जर वर्ड प्रोसेसरचा उगम उपलब्ध झाला तर अशा प्रणालीला व्हायरस चिकटू नये याची आधीच काळजी घेता येते.
इंटरनेट एक्सप्लोअरर या मायक्रोसॉफ्टच्या ब्राउजरला असे अनेक जंतू चिकटतात असे सिद्ध झाले आहे. या जंतूंमुळे तुमच्या संगणकावरील माहिती इंटरनेटद्वारे पळवली जाते. शिवाय हा जंतू बाहेरून चिकटला आहे, का मूळ उगमातच अंतर्भूत आहे हा संशय शिल्लक राहतोच. मायक्रोसॉफ्ट आपला कोणताही उगम कार्यक्रम उघड करत नाही. म्हणून त्यांच्या सर्व प्रणाली अमुक्त (आणि धोकादायक) आहेत असे म्हणता येईल.
मुक्त प्रणाली आपला उगम कार्यक्रम इंटरनेटवर जाहीर करतात. तो सतत अनेक तज्ञांच्या देखरेखीखाली असतो. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.
आज आपण संगणकीय युगात वावरत आहोत. उच्चशिक्षित व्यक्ति पासून ते अक्षरओळखही नसलेल्या माणसापर्यंत (भ्रमणध्वनी मधे संगणकच असतो.) प्रत्येक जण संगणक मोठ्या प्रमाणात वापरतो. या प्रत्येक संगणकात जर मुक्त प्रणाली वापरली गेली तर माणसाचा खाजगीपणा जपला जाईल आणि बडे भैय्या आपल्यावर सतत नजर ठेवू शकणार नाहीत. बहुचर्चित स्मार्ट-सिटी मधील स्मार्ट यंत्रणांपासून ते मतदान यंत्रांपर्यंत प्रत्येकात लहानसे पण ताकदवान संगणक वापरले जातात हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातली प्रत्येक प्रणाली मुक्त असायला हवी ही मागणी आपण केली पाहिजे.
मुक्त प्रणालींनी देऊ केलेल्या इतर स्वातंत्र्याचे फायदे पुढच्या लेखात वाचा…
मी मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कर्ता आहे. (मुक्त संगणक प्रणाली म्हणजे काय ?) जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत.
This simple timer makes the output LED “on” for some time and then goes “off”. The chip NE555 (or equivalent) is off the shelf available and is low cost. वाचन सुरू ठेवा “Simple timer”
Every thing is a number for a micro controller. How does it then treat data, address, and an instruction separately ? Here is the answer…. वाचन सुरू ठेवा “After all, it's a number game”